रायगड : कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्राने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान तीव्र राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही दुर्गम किंवा ठरावीक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजेच १७ ते २० जुलै दरम्यान या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आज १६ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज (१६ जुलै) विजांचा कडकडाट, ३०-४० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ ते २० जुलै दरम्यान रोज 'मध्यम स्वरूपाचा' पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
रत्नागिरी आज (१६ जुलै) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ जुलै रोजी मध्यम पाऊस, तर १८ ते २० जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडेल.पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. १७ जुलै रोजी हलका पाऊस, तर १८ ते २० जुलै दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे तर १७ ते २० जुलै या संपूर्ण कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहील. मुंबई जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
मच्छीमारांसाठी सावधानतेचा इशारा
हवामान विभागाने वर्तवलेले हे सर्व अंदाज संबंधित दिवसांत 'खूप जास्त शक्यता' या श्रेणीतील असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमार व शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.