रायगड ः जयंत धुळप
पर्यटनाच्या बाबतीत गेल्या 15 ते 20 वर्षांत जनसामान्यांमध्ये मोठी रुची निर्माण झाली आहे. अत्यंत धकाधकीच्या नोकरी-व्यवसायाच्या जीवनात थोडासा वेळ काढून रिलॅक्स होणे, त्याच त्याच कामाच्या व्यापातून एखादा ब्रेक घेण्याकरिता पर्यटनस्थळी जाणे, अशी मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने एकूण देशांतर्गत आणि परदेशातही पर्यटनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्याचा विचार केला, तर गतवर्षी म्हणजे 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 18.9 कोटी देशी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीचा वाटा सर्वात मोठा आहे.
कोकण हे पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय झाले आहे. विशेषतः, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत कोकणातील काही विशिष्ट ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. कोकणातील सर्वाधिक पर्यटक गर्दीच्या ‘टॉप 5’ पर्यटनस्थळांमध्ये अनुक्रमे अलिबाग, गणपतीपुळे, मालवण-तारकर्ली, मुरुड-जंजिरा आणि दापोली या पाच पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
कोकणातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांच्या संख्येचा अधिकृत आकडा दरवर्षी बदलत असतो; परंतु सरकारी आकडेवारी आणि स्थानिक पर्यटक संख्या अहवालांनुसार, सन 2024-25 या काळात या पाच पर्यटनस्थळांना पर्यटकांनी मोठी पसंती दाखवल्याने स्वाभाविकच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या विक्रमी होती.
अलिबागला 20 लाख पर्यटकांनी दिली भेट
कोकणातील ‘टॉप-5’ पर्यटनस्थळांपैकी प्रथम क्रमांकावर असलेल्या अलिबागला वर्षभरात तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने येथे सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असते. 31 डिसेंबरच्या एकाच दिवशी येथे तब्बल 8 हजार पर्यटक आले होते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळे अलिबाग हे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. सेलिब्रिटींनीही येथे ‘सेकंड होम’ घेऊन ठेवली आहेत. मुंबई ते मांडवा (अलिबाग) हा सागरी प्रवास अत्यंत आनंददायी आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने यामार्गे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण अधिक आहे.
याशिवाय स्वतःची कार घेऊन येण्याकरिता असलेली रो-रो बोट सेवेला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे. रेवस-मांडवा, सासवने, आवास, किहीम, थळ, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल-रेवदंडा असे निसर्गरमणीय समुद्रकिनारे आणि किनाऱ्यांवरील घरगुती निवारा वा कॉटेज आणि त्यामधील माशांचे घरगुती जेवण, पोपटी यामुळे अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण विक्रमी आहे. अलिबाग समुद्रकिनारा, कुलाबा किल्ला, वरसोली आणि नागाव बीच ही पर्यटकांची प्रथम क्रमांकाच्या पसंतीची ठिकाणे आहेत.
धार्मिक पर्यटनाबरोबरच सागरकिनाऱ्याचे गणपतीपुळे
कोकणातील ‘टॉप-5’ पर्यटनस्थळांतील मोठ्या गर्दीचे दुसरे स्थळ गणपतीपुळे आहे. गतवर्षभरात 12 लाख पर्यटकांनी येथे भेट दिली. दिवाळीच्या सुट्टीत एका आठवड्यात साधारणत: 3 लाख पर्यटकांनी भेट दिली. शनिवार-रविवारसह सुट्टीच्या दिवसाबरोबरच दर महिन्याच्या संकष्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होत असते. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ आहे. येथील स्वयंभू गणपती मंदिर समुद्राच्या अगदी काठावर आहे. प्राचीन गणपती मंदिर, स्वच्छ पांढरा समुद्रकिनारा, प्राचीन कोकण संग्रहालय या आकर्र्षणामुळे येथे वर्षभर गणेशभक्त आणि पर्यटक या दोन्ही वर्गांची मोठी उपस्थिती असते. येथून जवळच असलेल्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक पाहण्याकरिता येणाऱ्या अक्षरप्रेमी पर्यटकांचेही प्रमाण मोठे आहे.
जलदुर्गाचे मुरुड-जंजिरा इतिहासप्रेमी पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ
सागरी जलदुर्गाचे मोठे आकर्षण पर्यटकांमध्ये आहे, हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या पर्यटनस्थळाने सिद्ध करून दाखवले आहे. मुरुड-जंजिरा येथे वर्षभरात 6 लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात. ऐतिहासिक जंजिरा आणि पद्मदुर्ग या किल्ल्यांमुळे येथे पर्यटकांचा राबता असतो. मुरुडमधील सिद्धीचा राजवाडा, मुरुड बीच, पद्मदुर्ग यासह येथील विविध माशांच्या जेवणाची लज्जतदार मेजवानी ही पर्यटकांच्या पसंतीस उतरत असते. निसर्गप्रेमी पर्यटकांकरिता येथून जवळच असलेले फणसाड अभयारण्य हे मोठे आकर्षण आणि अभ्यास केंद्र आहे.