रायगड : रायगड जिल्ह्यातील जागावाटप आणि अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. या नव्या समझोत्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत तटकरे हे या जागी आमदार होते, परिणामी यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली जाणार असे सांगण्यात येत आहे.
मात्र ही चर्चा सूरु असतानाच मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पूत्र रायगड जि.प. सदस्य विकास गोगावले यांनी विधानपरिषदेच्या जागेवर दावा करुन आज विधानपरिषद उमेदवारीचा अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतला आहे.
गेल्या दोन वर्षापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आणि आगामी निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना या घटक पक्षांमध्ये मोठा वाद सूरु आहे. त्यांतून आरोपप्रत्यारोप विकोपाला पोहोचले आहेत. मात्र आता हा तिढा सोडवण्यासाठी अखेर भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेत एक नवा समझोत्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
महायुतीमध्ये कोणतीही बिघाडी होऊ नये आणि आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकसंध राहून लढावेत, यासाठी भाजपने हा मधला मार्ग काढल्याचे बोलले जात आहे. या नव्या प्रस्तावामुळे रायगडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकणार आहेत, असा दावा केला जात आहे.
या नव्या राजकीय समझोत्यामुळे महायुतीने रायगड जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद देऊन स्थानिक शिवसैनिकांची बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण करण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असल्याचे सांगीतले जात आहे.
जिल्ह्यातील जागावाटप आणि अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही पक्षांमधील वाद वाढल्यास त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो, हे ओळखून भाजपने वेळीच मध्यस्थीस सुरुवात केली आहे. भाजपकडून येणार प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना या उभय पक्षांनी मान्य केला तर रायगडमधील महायुतीमधील संभाव्य बंडखोरी टळू शकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
उद्याच काय तो निर्णय होईल
आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला बैठकीसाठी गेले आहेत. उद्या ते आल्यावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सद्यस्थितीत रायगड करिता कोणताही अधिकृत फॉर्म्यूला ठरलेला नाही. उद्याच त्या बाबत काय तो निर्णय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.