मुरुड : सुधीर नाझरे
महाराष्ट्रातील सर्वात मोठे बगाड म्हणून बावधनचे बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. वाई तालुक्यातील बावधन या ठिकाणी बगाड यात्रेला सुरुवात झाली. रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा होत असते. या यात्रेला सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक येत असतात. यावेळी लाखो भाविक उपस्थिती लावतात बगाड्या भक्तास बांधले जाते.
बैलांच्या सहाय्याने बगाड ओढलं जातं. बगाड ओढायला सुमारे 500 बैलांना जुंपल जातं. साडे तीनशे वर्षापासून ही यात्रा साजरी होत आहे. 50 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर पर्यंत बैलांच्या मदतीने ओढले जाते. चतुर्थीला गावात छबिना निघतो. देवाच्या पालखीसमोर ढोल, लेझिम, सनई, दांडपट्टा असे विविध खेळ सादर केले जातात. पंचमीच्या पहाटे पालखीबरोबरच बगाड्या सोनेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचतो. कृष्णा नदीत स्नान करून सोनेश्वराला नैवेद्य अर्पण करून, कृष्णामाईची ओटी भरून बगाड्याला शीडावर टांगले जाते.
बगाड हे या यात्रेचं मुख्य आकर्षण. ओझर्डे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या तिरावर असलेले सोनेश्वराचे मंदिर 18 व्या शतकात पिसाळ देशमुखांनी बांधले आहे. श्री शंकराची आकर्षक पिंड येथे असून पिंडीसमोरील नंदीच्या गळ्यात बगाड्याची प्रतिकृती आहे. सुमारे 350 वर्षापासून बगाड यात्रेस सुरुवात झाली. होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात नवसकार्याचा कौल लावला जातो. उजवा कौल ज्याचा तो बगाड्या ठरतो. यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरातच राहतो.
होळी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत बगाड्याचा उपवास असतो. बगाडाचा रथही वैशिष्ट्यपूर्ण असतो. गावच्या थोरल्या विहिरीतील बगाडाचे खांब, कणा, बोटले रथासाठी वाजतगाजत मंदिरासमोर आणतात. बगाडाचा रथ तयार करणे हाही यात्रेचाच भाग आहे. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. 10 फूट लांबीच्या कण्याला 18 फूट उंच वाघाचे तोंड असलेले खांब जोडून त्यावर 40 फूट उंच बांबूंचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. शीडाच्या टोकाला झोपाळा असतो. त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते.