पाली (रायगड) : शरद निकुंभ
दिवाळी सुट्यांमध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार (२५ ऑक्टोबर) पालीत भाविकांची मोठी रेलचेल होती. शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या अजून ८ ते १० दिवस असल्यामुळे पालीत भाविकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजीत आला आहे. मात्र भाविकांच्या व इतर वाहनांमूळे पालीत वाहतुक कोंडी वाढत आहे.
श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दाखल होत आहेत. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल होत असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. दिवाळी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट केली आहे. मंदिरात व मंदिराबाहेर मोठ्या व सुबक रांगोळ्या देखील काढल्या आहेत. दिवाळी सुट्टयांमुळे मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले आहेत.
लॉजिंग बोर्डिंग वाल्यांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. सध्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तूंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार, फुल, पापड व मिरगुंड विक्रेते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदिंचा धंदा चांगला होत आहे. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून येत आहेत.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्वतोपरी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली येथे प्रसाद, हार, फुले नारळ, खेळणी, पापड लोणचे व विविध वस्तूंची खरेदी देखील करत आहेत. हॉटेल मध्ये देखील जातात. त्यामुळे सर्वांचा धंदा तेजीत होत आहे. - मनोज मोरे, दुकानदार
वाहतुककोंडी जटील
येथील अरुंद रस्ते, विनाप्रवेशमधून जाणारी वाहने, अवजड वाहनांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहेत. अरुंद रस्त्यामुळे व अवैध पार्किंगमुळे दोन्ही बाजुने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूककोंडी होते. अशा वेळी पोलिसांचे प्रयत्न असफल ठरतात. या वाहतूककोंडीचा त्रास पादचाऱ्यांना सुद्धा होतो. मंदिर परिसरात देखील अवैध्यरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. हे थांबविण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकर करण्याची मागणी होत आहे.