रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: राजेवाडी फाटा ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गावर जोडणाऱ्या गावागावातील अंतर्गत रस्त्यांची महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्गाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे येथे अनुयायांना थेट मुंबई-गोवा हायवेने जाता यावे याकरिता राजेवाडी फाटा ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे निर्मिती करण्यात आली.
सावित्री पुल उद्घाटन 2017 रोजी या महामार्गाला मान्यता देण्यात आली. 2019 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणे गरजेचे असताना अद्याप हे काम अपूर्ण आहे. महामार्गावर जोडणाऱ्या गावागावातील अंतर्गत रस्त्यांची महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली आहे.
पूर्वीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करीत दोन पदरी महामार्गाचे काम 2017 साली भूमिपूजन करण्यात आलेले असताना आज देखील हे काम अपूर्ण स्थितीत असून या महामार्गावर अनेक ठिकाणी पूल मोऱ्यांचे आणि रस्त्याचे काम देखील अपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर या राष्ट्रीय महामार्गावरील जोडणाऱ्या गावांचे अंतर्गत रस्त्यांची देखील दुरवस्था झाली असून अंतर्गत रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडून 100 मीटर अंतरावर अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे या कामामध्ये बंधनकारक आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांची डागडुजी आजपर्यंत झालेली नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर सगळ्याच बस थांब्यांची देखील दुरवस्था झाली असून राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढली असल्याकारणाने बस थांबे महामार्गापेक्षा खाली गेले आहेत. त्यामुळे बस थांब्यांची देखील नव्याने उभारणी करावी लागणार आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारे सदर सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील चिंभावे सावत फाटा येथून चिंभावे एसटी स्टँडकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या उंचीप्रमाणे आणि रुंदीने या अंतर्गत रस्त्याचे काम होणे क्रमप्राप्त आहे.
अंतर्गत रस्त्याची उंची वाढलेली नसल्याकारणाने चिंभावे एसटी स्टँडकडे जाणाऱ्या वाहनांना आणि चिंभावे एसटी स्टँड कडून राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या वाहनांना वाहने वळविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीने होणे गरजेचे असल्याचे पाहायला मिळत असून हे काम तात्काळ व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
महामार्गाचे काम 2017 साली मंजूर
राष्ट्रीय महामार्गाचे काम 2017 साली मंजूर झालेल्या असताना 2019 सालापर्यंत पूर्ण व्हावे अशी कामाची निविदा असताना आज तागायत 2026 मध्ये देखील काम पूर्णत्वाला गेलेले नाही. या राष्ट्रीय महामार्गावरील मोऱ्या, पुलाचे काम त्याचबरोबर अनेक गावांच्या दरम्यान रस्त्याचे काम देखील अपूर्ण आहे. हे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे.