एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्ते विकासाच्या कामामुळे दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालया भोवती निर्माण झालेली गंभीर परिस्थिती. pudhari photo
रायगड

Raigad News : रस्ते विकासकामामुळे शाळेच्या अस्तित्वालाच धोका

डीकेईटीची एमएसआयडीसीला कायदेशीर नोटीस

पुढारी वृत्तसेवा

रायगड : अलिबाग-रेवदंडा बायपास रस्त्याच्या अपग्रेडिंगचे काम करताना नैसर्गिक पाण्याचा मार्ग बंद केल्याने चेंढरे येथील चिंतामणराव केळकर विद्यालयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या कामामुळे पावसाळ्यात शाळेच्या पटांगणात पाणी साचून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत गेल्या 16 फेब्रुवारी 2026 रोजी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली होती, आज महिना होवून गेला तरी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अखेर दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टने वकिलामार्फत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) कार्यकारी अभियंत्यांना दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे, अशी माहिती दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

प्रलंबित दाव्यात प्रतिवादी करण्याचा इशारा

या प्रकरणाबाबत यापूर्वीच अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग तहसीलदार आणि ग्रामपंचायत चेंढरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने अलिबाग दिवाणी न्यायालयात मुकदमा नं. 179/2025 दाखल करण्यात आला आहे. आता या नव्या विकासकामामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर, जर दोन महिन्यांत नैसर्गिक पाण्याचा मार्ग मोकळा केला नाही, तर एमएसआयडीसीला देखील या दाव्यात प्रतिवादी करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ट्रस्टने आपल्या या कायदेशीर नोटीसीमध्ये दिला आहे.

पाण्याचा नैसर्गिक मार्ग रोखल्याचा आरोप

विद्यालयाच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी यापूर्वी सिमेंट पाईपची व्यवस्था करण्यात आली होती, जी नैसर्गिक जलस्त्रोताला जोडलेली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या रस्ते विकासकामांतर्गत शाळेच्या उत्तर बाजूच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली आहे. या खोदकामामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, आगामी पावसाळ्यात शाळेचे संपूर्ण पटांगण चिखल आणि दलदलीचे केंद्र बनण्याची भीती नोटीसीमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न

चिंतामणराव केळकर विद्यालयात सुमारे 2,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रस्त्याच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच, निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कंत्राटदाराकडून दिवसा काम सुरू ठेवले जात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचा थेट फटका शालेय बसेसना बसत असून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचेही नमुद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT