अलिबाग : अलिबाग तालुक्यात १ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व वेगवान वाऱ्यामुळे भात रोपवाटिका तसेच फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात भाताचे एकूण ११,४२८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून ९०२ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नदी-नाल्यालगतच्या सखल भागात पुराचे पाणी साचल्यामुळे सुमारे ३२० हेक्टर क्षेत्रावरील भात रोपवाटिका पाण्याखाली गेली आहे. पावसाने लवकर उघडीप न दिल्यास या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय, वेगवान वाऱ्यामुळे तालुक्यातील काही भागांतील आंबा, नारळ, सुपारी व इतर फळबागांमध्ये झाडांच्या फांद्या तुटणे व काही झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू असून शेतकऱ्यांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.
सदर नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, अलिबाग प्रवीण ठिगळे, तालुका कृषी अधिकारी, अलिबाग तन्मय भगत, मंडळ कृषी अधिकारी, पोयनाड हिंदुराव मोरे तसेच मंडळ कृषी अधिकारी, नागाव मोहन सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली तसेच आवश्यक कृषी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
कृषी विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांना भात रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत असून, पाण्याचा निचरा, रोपवाटिकेची नियमित पाहणी व पुढील लागवडीसंदर्भात योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.