रायगड: अलिबाग तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पर्यटन व्यवसायामुळे ओळख असली तरी येथील अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत शेती आणि पशुपालन आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुक्या चाऱ्याच्या भीषण टंचाईमुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे.
सतत बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि अनियमित हवामानामुळे चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, सध्या सुक्या चाऱ्याची तीव्र कमतरता जाणवत असून पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.
पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होताना दिसत आहे. दुधाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
एकीकडे दुधाला मिळणारा दर आणि दुसरीकडे वाढता खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण बनले आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने सुक्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. अन्यथा येणाऱ्या काळात पशुपालन व्यवसाय मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या सुक्या चाऱ्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्यामुळे त्यांचे आरोग्य खालावत आहे आणि दूध उत्पादनही कमी झाले आहे. खर्च वाढत चालला आहे, पण उत्पन्न घटत असल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत.- मितेश वैद्य, दुध व्यावसायिक,चौल.