State Level Marathi Literary Meet
पनवेल: पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील कवी व गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता व गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड व विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या दोन्ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत असून, कवी संमेलने, गजल मुशायरे, चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांद्वारे मराठीचा गोडवा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संमेलनाची सुरुवात वारकरी दिंडीने होणार असून ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात ग्रंथदिंडी, टाळ-चिपळ्यांच्या गजरात आणि तुळशी वृंदावनासह पारंपरिक पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. पनवेलच्या साहित्य-सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या रूपरेषेत उद्घाटन सोहळा, प्रत्येकी एक तासांची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा तसेच दोन विशेष कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, अशी माहिती विश्वव्यापीचे उपाध्यक्ष गजलकार प्रशांत वैद्य (टिटवाळा) यांनी दिली.
गेल्या वर्षापासून ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यंदा या पुरस्कारासाठी १५ हजार रुपये रोख रक्कम व मानपत्र देण्यात येणार असून, ‘स्व. हरिश्चंद्र चांगू कडू’ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रदान केला जातो. निवड समितीचा निर्णय येत्या आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव गजलकार बंडू अंधेरे यांनी दिली.
संमेलनाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष आणि अन्य मान्यवरांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. राज्यभरातील साहित्यिक, रसिक आणि मराठीप्रेमींनी या साहित्य पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठानचे सचिव शर्वाय कडू यांनी केले आहे. लवकरच नियोजन समितीची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहभागासाठी कविता व गजल व्हॉट्सअॅप क्रमांक ९९२०१५८३३८ वर पाठवाव्यात. निवड झालेल्या साहित्यिकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. निवडीसंदर्भात आयोजकांना अनावश्यक संपर्क करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, दुपारच्या स्नेहभोजनाचीही मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.