रोहे : महादेव सरसंबे
रायगड जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरुवात केली. परंतु पावसाने उशिरा सुरुवात केल्यानंतर दमदार पाऊस आजपर्यंत पडत आहे. मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे. सध्या जिल्ह्यातील धरणामध्ये सरासरी ९५.८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच वेळी ७५ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा उपलब्ध होता.
जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या २८ धरणापैकी २४ धरणे १०० टक्के भरली आहेत. या धरणातून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणामध्ये जिल्हयातील २ धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित दोन धरणामध्ये ५० टक्केच्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे, पावसाचा जोर कायम असल्यामुळे ही धरणे लवकरात १०० टक्के भरतील असा अंदाज आहे.
रायगड जिल्ह्यातील १०० टक्के भरलेले धरणामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, पेण तालुक्यातील आंबेघर, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत तालुक्यातील साळोख, अवसरे, खालापुर भिलवले, कलोते मोकाशी, डोणवत, पनवेल तालुक्यातील मोरबे, बामणोली, उसरण या धरणांचा समावेश आहे.
कार्ले, रानवलीत सर्वात कमी पाणीसाठा
दुसरीकडे १०० टक्के भरणाच्या मार्गावर असलेली धरणामध्ये अलिबाग तालुक्यातील श्रीगांव ९५ टक्के, उरण तालुक्यातील पुनाडे ९१ टक्के यांचा समावेश आहे जिल्ह्यातील पाणीसाठा कमी असलेल्या धरणामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले ५७, रानीवली ४३ टक्के या धरणांचा समावेश आहे.