रायगड : राष्ट्रीय लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. शिवाय न्यायालयांवरील खटल्यांचा ताणही कमी होण्यास मदत होत आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी (28 सप्टेंबर) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 13 हजार 529 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात तब्बल 25 कोटी 58 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई रक्कम वसुल करण्यात आली आहे.
दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या 28 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 13 हजार 529 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील 50 हजार 709 वादपूर्व प्रकरणे व 9 हजार 132 प्रलंबित अशी एकूण 59.841 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 12 हजार 173 वादपूर्व प्रकरणे व 1 हजार 356 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 13 हजार 529 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकअदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 25 कोटी 58 लाख 67 हजार 36 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.
मोटारअपघात प्रकरणांमध्ये 2 कोटी 39 लाख 76 हजार सातशे इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 25 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना 2 कोटठी 39 लाख 76 हजार 700 इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 डॉ. श्रीमती सृष्टी निळकंठ व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो.
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात पेण तालुक्यातील 2, रोह्यातील 1 आणि खालापूर तालुक्यातील 1 अशा चार जोडप्यांचा सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत 27 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.