वाफगाव : पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी राजगुरुनगर एसटी आगारातून खेड व आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी जादा गाड्या सोडणार असल्याचे आगार व्यवस्थापक शिवकन्या थोरात यांनी सांगितले.
कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर यात्रा मोठ्या स्वरूपात भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी आरामदायी प्रवास करावा या उद्देशाने ज्या गावांमधून मागणी असेल तेथे एसटी सुविधा उपलब्ध करणार आहे. यासाठी किमान 44 प्रवासी गावातून असणे गरजेचे असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. तसेच या 44 प्रवाशांना पुन्हा परतीचा प्रवास करण्यासाठी पंढरपूर येथूनही बस उपलब्ध करून देणार आहे.
बससाठी प्रवाशांकडून नियमित भाडेच घेतले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, प्रवासी पास आदी सर्व प्रकारच्या सवलतीही लागू असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ग्रुप बुकिंगसाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवकन्या थोरात (मोबाईल क्र. 8378874990) अथवा वाहतूक नियंत्रक नागेश्वर वैरागर (मोबाईल क्र. 9146084909), रमेश चिपाडे (मोबाईल क्र. 9922166520) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.