file photo 
पुणे

बॉयलर 1 ऑक्टोबरला पेटणार; ऊस गाळप वेळेत पूर्ण होण्यासाठी सहकारमंत्र्यांची सूचना

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुढील हंगामामध्येही उसाची मोठी उपलब्धता राहण्याचा अंदाज असून, वेळेत गाळप होण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करावा लागेल. त्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत,' असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम इंदलकर, यशवंत गिरी उपस्थित होते.

ते म्हणाले, 'ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये 200 पैकी 199 कारखाने बंद झाले असून, भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्यांकडून अद्याप ऊस गाळप सुरू आहे. 1320 लाख टन ऊस गाळप, 138 लाख टन साखर उत्पादन आणि साखरेचा सरासरी उतारा 10.40 टक्के मिळाला आहे. इथेनॉल उत्पादन वाढीमुळे सुमारे 20 लाख टन साखर उत्पादन कमी झाले. कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढविण्यावर भर दयावा. केंद्राने ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान योजना सुरू करावे.'

तारण कर्जउचल घटण्याचा फायदा

कारखान्यांकडून साखरेवर माल तारण कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले, हे फायदेशीर आहे. बँकांकडील तारण कर्जउचल घटण्यामुळे बँकांना अडचणी येत असल्या तरी कारखान्यांच्या व्याजाची बचत झाली आहे. कच्च्या साखरेची वाढलेली निर्यात, इथेनॉल विक्री व त्यास मिळत असलेला दर यामुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

बाजार समित्यांच्या निवडणुका घेणार

सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून बाजार समित्यांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा विचार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण याचे नियोजन करेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT