पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'फुरसुंगीच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात दोन आठवड्यांत शपथपत्र सादर करा,' असे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. उर्वरित काम कधी पूर्ण होईल, अशीही विचारणा न्यायालयाने केली आहे.फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांत पाणीपुरवठा योजना राबवण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया 2014 मध्ये झाली, तर 2017 मध्ये काम सुरू करण्याचे आदेश दिले गेले होते. योजनेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याची मुदत होती. ही मुदत संपली त्याला चार वर्षे लोटली तरीही काम पूर्ण झाले नाही. फुरसुंगी गावाचा चार वर्षापूर्वी महापालिकेत समावेश केला गेला. अद्याप पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने फुरसुंगी येथील रणजित रासकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सचिव व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आयुक्त पुणे महानगरपालिका, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका यांना याचिकेत प्रतिवादी केले आहे. रासकर यांच्या वतीने मनीष केळकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. उच्च न्यायालयाने लवकरात लवकर या परिसराला पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वकिलांनी योजनेच्या कामाची माहिती न्यायालयात दिली. 35 एमएलडी इतके पाणी या भागाला दिले जाणार आहे. योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, असा दावा वकिलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे.
टँकरची संख्या वाढवा
प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. महापालिकेने योजना पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत अतिरिक्त पाणी कशा पद्धतीने व कधीपासून पुरविले जाईल याचे स्पष्टीकरण न्यायालयाने मागितले आहे.
हेही वाचा