khed shivapur  
पुणे

फास्टटॅग नावालाच ! टोलनाक्यावर वाहने ताटकळतच !!

अमृता चौगुले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा

खेड शिवापूर टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर काही वर्षांपूर्वी फास्टटॅग सुरू केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी, त्याला लागणारा वेळ व नागरिकांना होणारा त्रास. हा त्रास कमी होण्यासाठी ही यंत्रणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे राबविली जात आहे.

मात्र, शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी फास्टटॅग असूनही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. याला नक्की जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवार व रविवार असे सलग सुट्टीचे दोन दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोल्हापूर, गोवा, महाबळेश्वर व कोकणात फिरायला जातात.

त्याचप्रमाणे लग्नसराईचे दिवस अंतिम टप्प्यात असून नागरिक कार्यासाठी बाहेर पडलेले असतात. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या नागरिकांना व पर्यटकांना खेड शिवापूर टोलनाक्यावर लागलेल्या वाहनांच्या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. सुमारे 90 टक्क्यांहून अधिक वाहनचालकांकडे फास्टटॅग उपलब्ध असूनही त्यांना रांगेत ताटकळत थांबावे लागते, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व बाबी लक्षात घेता फास्टटॅग असूनही याचा काहीही उपयोग होत नसल्याचे वाहनांच्या लागलेल्या रांगांवरून स्पष्ट होत आहे.

अनेक वाहनचालक फास्टटॅगचा रिचार्ज करीत नाहीत. वाहने लेनजवळ आली की काही जण फास्टटॅग रिचार्ज करायला लागतात. ज्या लेनवर गर्दी कमी आहे, त्या लेनवर चारचाकी वाहन घेण्यास चालक प्राधान्य देतात; मात्र त्यांच्याकडे कधी फास्टटॅग बॅगेत ठेवलेला असतो तर कधी वाहनाच्या इतर भागावर चिकटवलेला असतो. त्यामुळे ते वाहन पास होण्यासाठी वेळ लागतो. परिणामी वाहनांच्या रांगा लागतात.
अमित भाटिया, व्यवस्थापक, खेड शिवापूर टोलनाका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT