मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : मुर्टी ते गुळुंचे रस्ताकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे वाहनांचे नुकसान होत आहे, निरा-मोरगाव रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील पुलाचे काम दुर्दशायुक्त झाले आहे. ठेकेदार काम चांगले करीत नसल्याबद्दल भाजप उद्योग आघाडीचे सचिव बाळासाहेब बालगुडे यांनी आरोप केला आहे.
मुर्टी-गुळुंचे रस्त्याचे काम ठेकेदार व्यवस्थित व दर्जेदार करीत नसून, अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे वाहने बिघडतात व वाहनधारकांना त्रास होत आहे. संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असूनसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करतात, असे नागरिकांचे मत आहे.
नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे रासकरमळा, उंबर ओढा, सोमेश्वर पाटी, जाभळी ओढा येथील खड्डे पाण्याने भरल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. हा मार्ग उत्तर व दक्षिण भारतात जाण्यासाठी अत्यंत जवळचा असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.