भिगवण : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणाला व मानवी आरोग्यास अपायकारक असणारी भिगवण स्टेशन येथील राख वाहतूक बंद करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
सिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या डस्ट वाहतुकीवरून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व राख वाहतूकदार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव तात्पुरता निवळला आहे.
सिमेंट तयार करण्यासाठी लागणारी डस्ट भिगवण स्टेशन येथे उतरवली जाते. यामुळे या भागात नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तसेच शेतीवरही याचा परिणाम जाणवू लागला होता. नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याने राख वाहतुकीच्या गाड्या अडविण्यात आल्या, यावरून मोठा गदारोळ झाला. या प्रश्नावर दि.24 रोजी सरपंच तानाजी वायसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेमध्ये राख वाहतूक चालू ठेवायची की नाही यावर उपस्थित ग्रामस्थांचे म्हणणे घेण्यात आले. 158 पैकी 144 ग्रामस्थांनी राख वाहतुकीस विरोध केला. राख वाहतूक बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या वेळी पराग जाधव, संजय देहाडे, बाबासाहेब शिंदे, सत्यवान भोसले, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, गुराप्पा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.