बारामती : पुढारी वृत्तसेवा : शहरातील तांदूळवाडी येथील रेल्वेफाटक फेब्रुवारीपासून बंद असल्याने वाहनचालक, पादचार्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कामाचे कारण देत हे फाटक बंद केले गेल्याने बरेचसे पादचारी, सायकलस्वार, मोटारसायकल रेल्वेरूळ वेळी-अवेळी धोकादायक पध्दतीने ओलांडत आहेत.
फाटक बंद असल्याने तांदूळवाडी व परिरसातील नागरिकांना बारामती शहरात येण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने येथील फाटक सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे यांनी बारामती रेल्वे कार्यालयाकडे निवेदन दिले आहे.
तांदूळवाडी परिसरातील ग्रामस्थांना तसेच शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिक यांना विनाकारण मनस्ताप होत आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असणार्या रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याकामी रेल्वेफाटक बंद असल्याने वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांची व जनतेची मोठी गैरसोय होत आहे.
औद्योगिक वसाहतीत कामाला जाणार्या कामगारांना रात्रीच्या वेळी दादा पाटीलनगर येथील रेल्वेरुळाखालील रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तांदूळवाडी गावातील रेल्वेफाटक तत्काळ खुले करावे व अपुरे राहिलेले भुयारी रेल्वे मार्गाचे काम तत्काळ पूर्ण करून घ्यावे; अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जावळे यांनी दिला आहे. निवेदनावर नीलेश कदम, मयूर जाधव, चंद्रकांत भोसले, संग्राम चांदगुडे आदींच्या सह्या आहेत.