पुणे

टिळकांमुळे शिवजयंतीला व्यापक स्वरूप मिळाले; प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'महात्मा फुले यांनी जयंती पुन्हा सुरू केली आणि समाधीची डागडुजी केली. शिवजयंतीला देशपातळीवर व्यापक बनविण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते,' असे मत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाने लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

या वेळी 'शिवजयंती : एक इतिहास' या विषयावर प्रा. नरके बोलत होते. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच प्रा. नरकेंनी समकालीन परिस्थितीत इतिहासाचे राजकारण करून वर्तमानाच्या प्रश्नांकडे राजकारणी लोक दुर्लक्ष करीत आहेत, अशीही खंत व्यक्त केली. प्रा. नरके म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी शिवजयंती कोणी सुरू केली?

या प्रश्नावरून राजकीय आणि समाजमाध्यमांच्या वर्तुळात दोन्ही बाजूंनी जी चर्चा झाली ती खूपच चिंताजनक आहे. शिवजयंती पूर्वीपासूनच सुरू होती. त्यामध्ये काहीसा खंड पडला होता. शिवाजी महाराजांच्या समाधीची अनास्था झाली होती. महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या वैचारिक परंपरा आणि सामाजिक दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी ते नेहमीच एकमेकांच्या विरोधात नव्हते.'

कोल्हापुरातील बर्वे प्रकरणाच्यावेळी टिळक- आगरकरांना शिक्षा झाली होती. त्या वेळी सत्यशोधकांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली होती. तसेच, त्यांची मिरवणूकही काढली याची उदाहरणे प्रा. नरकेंनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकमान्य टिळकांशी अनेक वैचारिक मतभेद होते, परंतु टिळकांच्या मुलाशी म्हणजेच श्रीधर टिळकांशी खूपच जवळची दोस्ती होती.

त्यामुळे श्रीधर टिळकांचा सामाजिक समतेचा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे, असेही प्रा. नरके म्हणाले. या वेळी इतिहास विभागाप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, प्रा. बाबासाहेब दुधभाते, डॉ. देवकुमार अहिरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT