पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आयकर विभागाच्या धाडीत कॅशचे गोदाम सापडल्याने एकनाथ शिंदे घाबरले होते. सोबत या अन्यथा जेलमध्ये जा, या भाजपच्या धमकीस ते खूपच घाबरले होते. दाढी खाजवत ते अक्षरश: रडत होते. ईडी, सीबीआयच्या दबावाच्या भीतीमुळे त्यांच्यासह काही गद्दार भाजपसोबत गेले, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आकुर्डी येथे मंगळवारी (दि. 22) केला.
मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी उमेदवारअर्ज दाखल केला. त्याप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, विविध प्रकरणाचे भ्रष्टाचारात सामील असलेले अनेक नेते 'एनडीए'मध्ये गेले आहेत. माती, डांबर तसेच, कोंबडी चोरही त्यात आहेत. सर्व भ्रष्टाचारी त्यांच्याकडे गेले. मग, बाकी कोण राहिले. तरीही भाजप 400 पार होणार नसल्याचे देशात चित्र आहे.
ठाकरे म्हणाले की, भाजपने दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा चिखल हटविला नाही. 'सोबत या नाही तर जेलमध्ये जा' अशा धमक्या देत अनेकांना पक्षात घेत, वॉशिंग मशिनमधून धुवून काढले आहे. सोबत येण्यास नकार दिल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले. 'सत्यमेव जयते' नाही, तर 'सत्तामेव जयते' हे भाजपचे ब्रीदवाक्य झाले आहे. दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर देशात गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार जाती असल्याची आठवण भाजपला झाली. आता विकास करणार असे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. हे चारही वर्ग देशात नाखूश आहेत. दहा वर्षांत महागाई, बेरोजगारी वाढली आहे.
हेही वाचा