खडकवासला : पुढारी वृत्तसेवा; रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्यापासून पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात कालपासून पडणार्या पावसाच्या संततधारेने गेल्या 24 तासांत खडकवासला साखळीत जवळपास पाऊण अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा वाढला आहे.
खडकवासला धरणसाखळीत मंगळवारी (दि.5) सायंकाळी पाच वाजता 3.55 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा झाला. धरणांतील साठा कमी असल्याने महापालिकेने सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून दासवे, तव, धामण ओहळ, दापसरे, गोंडेखल, टेकपोळे आदी भागांत पडत असलेल्या संततधारेने कोरड्या पडलेल्या ओढ्यानाल्यासह मोसे, आंबी नद्या उगमापासून दुथडी भरून वाहत आहेत.
पानशेत, वरसगावच्या धरण माथ्यासह खडकवासला, सिंहगड भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, खडकवासला वगळता टेमघरसह तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. काल सकाळी नऊ ते आज सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या 24 तासांत वरसगाव खोर्यातील दासवे येथे 77 मिलिमीटर पाऊस पडला. पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरला असला, तरी डोंगरी पट्ट्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. आज दिवसभरात सकाळी 6 ते सायंकाळी पाचपर्यंत टेमघर येथे 30, वरसगाव येथे 20, पानशेत येथे 21 व खडकवासला येथे 10 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, 'धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे शेतीसह पिण्याला 15 दिवस पुरेल इतके पाणी धरणसाखळीत वाढले आहे.'
हेही वाचा