बावडा : पुढारी वृत्तसेवा: निरा नदीचे पात्र सध्या पाऊस नसतानाही वाहत असल्याचे समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. निरा नदीवरील बंधार्यांचे पावसाळ्यापूर्वी शासकीय नियमानुसार ढापे काढण्यात आल्याने या बंधार्यांमधील साठलेले पाणी नदीपात्रातून वाहताना दिसून येत आहे. निरा नदीचे पात्र उन्हाळ्यामध्ये कोरडे पडले होते, त्यामुळे नदीकाठची पिके करपून चालली.
मात्र, आता नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या पिकांना जीवदान मिळाले आहे, अशी माहिती प्रगतशील शेतकरी दयानंद गायकवाड (बोराटवाडी), राहुल कांबळे (खोरोची), रणजित वाघमोडे (गोंदी) यांनी दिली. सध्या वीर, भाटघर, गुंजवणी, निरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने या धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात पाणी न सोडताही निरा नदी पाण्याने वाहत असल्याचे पाहून सराटी (ता. इंदापूर) येथील इंदापूर-अकलूज रस्त्यावरील पुलावरून ये-जा करणारे नागरिक आश्चर्यचकित होत आहेत. निरा नदीला पाणी आल्याने पावसाअभावी अडचणीत असलेल्या शेतकर्यांना व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा