बारामती : पुढारी वृत्तसेवा
माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकीन, मी सुद्धा आत्महत्या करेन, अशी धमकी देत युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आळंदी येथे बळजबरीने विवाह केल्याचा प्रकार बारामतीत उघडकिस आला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात अपहरणासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून एकजण फरारी आहे.
ऋषिकेश अविनाश जगताप (रा. बारामती) या मुख्य आरोपीसह त्याचे मित्र शुभम कराळे व किरण खोमणे (पूर्ण नावे नाहीत, रा. बारामती) या तिघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. यातील जगताप व काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर खोमणे हा अद्याप फरार आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले दि. ३० जानेवारी रोजी यासंबंधी युवतीने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीची व ऋषिकेश यांची यापूर्वीची ओळख होती. ओळखीमुळे तो सतत तिचा पाठलाग करत होता, लग्नाची मागणी घालत होता. परंतु ती त्याला दाद देत नव्हती. तिची त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. घटनेदिवशी तिच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती बसस्थानकावर सोडले. ही माहिती ऋषिकेश याला मिळतात त्याने संबंधित युवती ज्या बसमधून प्रवास करत होती, तिचा पाठलाग केला. शहरातील कसबा भागात बस थांबवत तिला खाली उतरण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. त्यानंतर बस पुढे निघून गेल्यावर त्याने तिला मोबाईलवर संपर्क साधत तु माझ्यासोबत आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकीन तसेच मी स्वतःही आत्महत्या करेन अशी धमकी दिली.
या धमकीमुळे भयभीत होवून ही तरुणी शिवरी (ता. पुरंदर) येथे उतरली. त्याने तेथून तिला आळंदी येथे नेत तिच्या मर्जीविरोधात तिच्याशी विवाह केला. या विवाहावेळी त्याचे मित्र शुभम कराळे व किरण खोमणे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यानंतर तिने बारामतीत येताच शहर पोलिस ठाणे गाठत अपहरण, विनयभंगाची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके याप्रकरणी तपास करत आहेत.