पुणे: येरवडा येथील खुल्या कारागृहातून परत एका कैद्याने पळ काढला आहे. हा कैदी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, 8 मे रोजी याच खुल्या कारागृहातून एका कैद्याने पळ काढला आहे.
याप्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने चंद्रकांत सयाजी खांदवे (वय 58) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैदी जनार्दन अडसुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 12 मे रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदी जनार्दन
अडसूळे याच्यावर खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयाने या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याच्या कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
तो तेथे शेतीतील कामे करत होता. 12 मे रोजी मात्र त्याने त्याला झालेली उर्वरित शिक्षा चुकविण्याच्या हेतूने फिर्यादींच्या कायदेशीर रखवालीतून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत अडसूळे खुल्या कारागृहात मिळून येत नाही हे लक्षात आल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या वतीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तर 8 मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने येरवडा कारागृहातून पळ काढला होता. त्याचा अद्याप पत्ता पोलिसांना लागलेला नाही. तो पर्यंत परत दुसऱ्या कैद्याने पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.