येरवडा: येरवडा येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्राबाहेर तसेच परिसरातील विविध ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी उभारण्यात आलेले बेकायदेशीर लाकडी सांगाडे महिनोंमहिने तसेच उभे असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे जीर्ण सांगाडे कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ते तातडीने हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिव्यांग पुनर्वसन केंद्र ही संवेदनशील जागा असून, तिथे दररोज दिव्यांग नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठांची वर्दळ असते. नेमक्या याच केंद्राबाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून भलेमोठे लाकडी सांगाडे उभे आहेत. पावसामुळे लाकूड कुजले असून, ते कधीही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. याशिवाय येरवडा बाजार, तारकेश्वर शिव मंदिर पायथा, गुंजन चौक परिसरातही ठिकठिकाणी असे धोकादायक सांगाडे उभारलेले दिसतात.
हे सांगाडे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेतलेली नाही. तरीही कारवाई होत नाही, अनेक नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जाहिरात एजन्सी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाईला टाळाटाळ केली जाते. तक्रारी करूनही केवळ कागदी घोडे नाचवले जातात.
दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा येरवडा कृती समितीने दिला आहे. येरवडा आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी अमोल पवार यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.