Vidyanand Bapat on DJ Ban Pudhari
पुणे

Vidyanand Bapat on DJ Ban: ‘डीजे बंद करा!’ म्हणणारे विद्यानंद बापट आता पक्ष काढणार? थेट सांगितला, पुढचा प्लॅन काय?

Vidyanand Bapat on DJ Ban: ध्वनी प्रदूषणाचा त्रास अनेकांना होत असूनही नागरिक त्याविरोधात आवाज उठवत नाहीत, अशी खंत विद्यानंद बापट यांंनी व्यक्त केली.

Rahul Shelke

Vidyanand Bapat on DJ Ban: पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश ढोल-ताशांच्या विरोधात पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ध्वनी प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर नागरिकांना होत असूनही अनेकजण त्याविरोधात आवाज उठवत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करत बापट यांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बापट यांनी पुण्यातील नागरिकांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. ध्वनी प्रदूषणासारख्या गंभीर समस्येविरोधात नागरिकांनी सक्रियपणे पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पुण्याच्या अभिमानाच्या गप्पा पुरेशा नाहीत’

पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान व्यक्त करण्याबरोबरच शहरातील समस्यांविरोधातही नागरिकांनी ठाम भूमिका घ्यायला हवी, असे बापट यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणासारखा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून, त्यावर प्रभावी उपाय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समस्येविरोधात पुरेसा नागरिकांचा आवाज ऐकू येत नसल्याने आपण स्वतः पुढे येऊन लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्ष किंवा संघटना काढणार का?

ध्वनी प्रदूषणासह विविध सामाजिक प्रश्नांवर बापट सातत्याने भूमिका मांडत असल्याने त्यांच्या विचारांना संघटित स्वरूप देऊन पक्ष किंवा संघटना स्थापन करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला.

यावर सध्या राजकारणात प्रवेश करण्याचा किंवा स्वतंत्र पक्ष सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. लोकशाही मजबूत राहण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सक्रिय नागरिक नसतील तर लोकशाही कमकुवत होते’

लोकशाही केवळ निवडणुका आणि संविधानापुरती मर्यादित नसून नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी आणि सार्वजनिक प्रश्नांसाठी सक्रिय राहणे गरजेचे आहे, अशी भूमिका बापट यांनी मांडली. नागरिकांचा सहभाग कमी झाला तर लोकशाहीची प्रत्यक्ष ताकद कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

अमेरिकेतील ‘सिटीझन अॅक्टिव्हिजम’च्या संकल्पनेचा आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातही नागरिकांनी आपल्या परिसरातील आणि समाजातील प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

‘समविचारी लोक एकत्र आले तर संघटना शक्य’

दरम्यान, भविष्यात त्यांच्या विचारांना संघटनात्मक स्वरूप देण्यास त्यांनी पूर्णपणे विरोध केलेला नाही. मात्र त्यासाठी सध्या कोणतीही निश्चित योजना किंवा आराखडा तयार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन, कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक श्रेयापेक्षा मुद्द्यांना महत्त्व देत संघटना उभी केली, तर त्याला आपली हरकत नसल्याचे बापट यांनी सांगितले. मात्र त्यासाठी आपल्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

त्यामुळे विद्यानंद बापट सध्या पक्ष किंवा संघटना स्थापन करण्याच्या तयारीत नसले, तरी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून भविष्यात संघटनात्मक व्यासपीठ उभे राहण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. सध्या त्यांचा मुख्य भर ध्वनी प्रदूषणासह सार्वजनिक प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठवण्यावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT