शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी नव्हे, तर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला होता. फक्त घाटमाथ्याच्या काही भागाला सावधानतेचा इशारा दिला होता. तो देखील सोमवारी रात्रीपर्यंत होता. त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाला हवामान विभागाने दिला नाही, असे स्पष्टीकरण पुणे वेधशाळेच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिले.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा व १२ वीपर्यंतच्या महाविद्यालयांना मंगळवारी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर करीत शाळांना सुटी देण्याचे आदेश काढले. मात्र, जिल्ह्यासह शहरात मंगळवारी ९ जुलै रोजी कुठेही पावसाचा मोठा जोर नव्हता. शहरात तर दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे समाज माध्यमांवर हवामान विभाग प्रचंड ट्रोल झाला.
त्या पार्श्वभूमीवर पुणे हवामान विभागप्रमुख डॉ. मेधा खोले यांना विचारणा केला असता त्यांनी सांगितले की, मी सोमवारी सुटीवर होते. तरी मला किंवा माझ्या विभागातील एकाही अधिकाऱ्याला जिल्हा प्रशासनातून याबाबत फोनवर विचारणा झालेली नाही. प्रत्यक्षात आम्ही पुणे जिल्हा आणि शहरात रेड अलर्ट दिलेला नव्हता. हे अलर्ट समजून घेण्यात चूक झाली असावी, असे वाटते.
डॉ. खोले यांनी सांगितले की, आम्ही सोमवारी जो अलर्ट दिला होता, तो घाट माध्यासाठी होता. तो देखील सोमवारी रात्री तीन तासांसाठी होता. मात्र, मंगळवारी कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट अथवा अतिवृष्टीचा अलर्ट दिलेला नव्हता. शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचाच अंदाज दिला होता.
मुंबईत सोमवार ते बुधवार असा तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला, हे खरे आहे. पण, मंगळवारी तेथे पाऊस झाला नाही. कारण, वाऱ्याचा वेग कमी झाला आणि ढग दुसरीकडे निघून गेले, असेही डॉ. खोले यांनी स्पष्ट केले.