भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी येथील आदिवासी महिलांना अनेक मैल पायपीट करून गाळमिश्रीत पाणी डोक्यावरून वाहून आणावे लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी येथील नागरिकांची स्थिती झाली आहे.
आदिवासी भागात नदीपात्र, बंधारे, शिवकालीन टाक्या, तळी कोरडी पडली आहेत. पावसाळ्यात चार महिने मुसळधार पाऊस पडूनही भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी उन्हाळ्यात कोरडीठाक पडतात. या भागातील विहिरी, शिवकालीन टाके, बुडीत बंधारे पावसाळ्यात तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यात येथे पाण्याचा थेंबही राहात नाही.
कोंढवळ, तळेघर, राजपूर, फलोदे, फुलवडे, मेघोली, मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरी, काळवाडी नंबर एक, काळवाडी नंबर दोन, नानवडे, माळीण, आंबडे, कोंढरे, भोइरवाडी, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, आवळेवाडी, घोडेवाडी, माळवाडी, घोटमाळ, बोरीचीवाडी, गोहे बुद्रुक, पाटीलबुवाची वाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मिकवाडी, पसडळवाडी, पाचवडवाडी, पोटकुलवाडी, आसाने, जांभळेवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी ग्रामस्थ दुष्काळाचा सामना करीत आहेत.
आदिवासी भागात पोखरी प्रादेशिक योजनेतून पाणी गळती व मेन लाइनला अनधिकृत नळजोडणीमुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत नाही. भर उन्हाळ्यात पाणी बंद झाल्याने 7 गावे टंचाईचा सामना करत आहेत. तेरुंगण पाझर तलावही गळतीमुळे आटला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.