Wagholi Traffic Pudhari
पुणे

Wagholi Traffic U-Turn Closure Issue: वाघोली आव्हाळवाडी फाटा यू-टर्न बंद; वाहतूक कोंडी अधिकच वाढली

यू-टर्न बंदीमुळे वाहनचालकांना वळसा, अपघाताचा धोका वाढला; आमदारांनी घेतली तातडीने दखल

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथील आव्हाळवाडी फाट्यावर वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागाने 1 मेपासून बॅरिकेड्‌‍स लावून यू-टर्न बंद केला. मात्र, या निर्णयामुळे कोंडी कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत दैनिक ‌‘पुढारी‌’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी तातडीने दखल घेत वाघोली वाहतूक शाखेला पत्र पाठवले आहे.

यू-टर्न बंद केल्यामुळे पुण्याकडून लोहगावकडे जाणाऱ्या वाहनांना केसनंद फाट्यावरून वळसा घ्यावा लागत आहे. परिणामी प्रवास वेळखाऊ ठरत असून, वाहनधारकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वेळ वाचवण्यासाठी काही वाहनचालक वाघेश्वर मंदिर चौकातून विरुद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी मर्यादित प्रमाणात दुचाकी येणाऱ्या वाहनांबरोबरच आता चारचाकी वाहनांपर्यंत वाढली असून, परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरुद्ध येणाऱ्या वाहनांमुळे वादावाचे प्रकार वाढले असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांनी वाहतूक विभागाने स्थानिक नागरिक, वाहनधारक यांना विश्वासात घेऊन तातडीने व्यवहार्य उपाययोजना कराव्यात, असे पत्राद्वारे नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर/कोलंबीकर यांच्याशी संपर्क केला असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

पायलट प्रकल्प राबवण्यापूर्वी नागरिकांचे मत जाणून घेणे गरजेचे

वाघोली - पुणे-नगर रोडवरील वाढती वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत मेट्रो व उड्डाणपूल प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, लवकरच या कामांना गती मिळेल. मात्र, तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजनांच्या नावाखाली कोणताही पायलट प्रकल्प राबवण्यापूर्वी वाहतूक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करणे आणि स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेणे अत्यावश्यक असल्याचे आमदार यांनी सांगितले.

आव्हाळवाडी फाटा येथील चौक बंद करण्याचा निर्णय वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने घेतला असला, तरी त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक आणि संभाव्य अपघात लक्षात घेता या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार होणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधून व्यवहार्य उपाययोजना राबवून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करावी.
ज्ञानेश्वर कटके, आमदार, शिरूर-हवेली
या चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिथे समस्या गुडघ्याची आहे, तिथे उपाय मात्र डोक्यावर केला जातोय, अशीच ही अवस्था झाली आहे. प्रशासनाने तातडीने वास्तव परिस्थिती ओळखून योग्य आणि परिणामकारक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
ॲड. गणेश म्हस्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT