पुणे: मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील शेतीपिकांना मोठा फटका बसला असून, आठ तालुक्यांतील 69 गावांमधील तब्बल 1532 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आपत्तीमुळे 3682 शेतकरी बाधित झाले असून, पंचनामे करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
18 व 19 मार्च रोजी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपिटीने पुरंदर, इंदापूर, हवेली, भोर, दौंड, राजगड, शिरूर आणि बारामती या तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, काकडी, कलिंगड, हरभरा, केळी, चारापिके, तसेच फुलपिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विशेषत: इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान नोंदविण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यात 646 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, 1269 शेतकरी प्रभावित झाले आहेत. तर, पुरंदर तालुक्यात 389.80 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन 1283 शेतकरी अडचणीत आले आहेत.
हवेली तालुक्यात 170 हेक्टर, दौंडमध्ये 110.20 हेक्टर, शिरूरमध्ये 93 हेक्टर, भोरमध्ये 78 हेक्टर आणि बारामतीत 41.70 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पुढील काही दिवसांतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असून, नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणीही पुढे येत आहे.