पुणे

आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी आवश्यक : श्रीकांत देशपांडे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'तुमचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल,' यासारखे तथ्यहीन प्रचार करणार्‍यांवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई केली पाहिजे. ईव्हीएमवरील आक्षेप हे राजकीय हेतूने प्रेरित असले, तरीही सर्वसामान्य लोकांना कळेल अशाच प्रकारे निवडणूक झाली पाहिजे. तसेच निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत राज्याचे माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी (दि.28) व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात 'निवडणूक आयोग : आरोप-प्रत्यारोप' या विषयावर देशपांडे बोलत होते. संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, संघाचे सरचिटणीस सुकृत मोकाशी, प्रतिष्ठानचे कार्यवाह गजेंद्र बडे आदी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, एखाद्या समुदायाला लक्ष्य करणार्‍या विधानांवर आयोगाने कठोर कारवाई केली पाहिजे. मग ते पंतप्रधान जरी असले तरी ते निवडणुकीत उमेदवार व पक्षाचे प्रचारक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

आयोगाची भूमिका संदिग्ध असल्यास सर्व उमेदवारांना समान संधी नाही, अशी धारणा मतदारांमध्ये वाढून त्याचा निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पर्यायाने लोकशाहीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच काही देशांनी निवडणुकीत 'ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकेचा वापर सुरू केला आहे. आपल्या देशात 'ईव्हीएम'वरील आक्षेप हे राजकीय हेतूने प्रेरित असले, तरीही सर्वसामान्य लोकांना कळेल अशाच प्रकारे निवडणूक झाली पाहिजे. त्यातूनच निवडणुकीची विश्वासार्हता व स्वीकारार्हता वाढेल. लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांत घेण्यावरून जे आरोप होतात, त्यावर आयोग जेव्हा स्पष्टता देईल तेव्हाच खरी परिस्थिती समोर येईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT