मुंढवा : कोरोनाकाळात रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील पूना बायो एनर्जी सिस्टीम व दिशा या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी महापालिकेकडून कचरा टाकण्यात आला. या ठिकाणी 1 लाख 39 हजार टन कचर्याचा ढीग साचला होता. हा कचरा उचलण्यासाठी निविदा (टेंडर) काढूनही 12 हजार टन कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी डंपिंग केलेला कचरा हटविण्यासाठी महापालिकेने टेंडर काढले होते. चार कंपन्यांना हे काम देण्यात आले. यातील एका कंपनीने महापालिकेकडून कचरा उचलण्याचे पैसे घेतले.
मात्र, कचरा न उचलल्याने त्यातील सुमारे 10 हजार टन कचरा तसाच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच सध्या येथे सुरू असलेल्या पूना बायो एनर्जी कचरा प्रकल्पामध्ये त्यांच्या मशिनरींचे काम सुरू असल्याने डिसेंबर 23 मध्ये त्यांना कचरा नको होता. मात्र, महापालिका या ठिकाणी कचरा टाकत असल्याने साचून असलेल्या कचर्यात दोन-अडीच हजार टनांची भर पडली. पूना बायो एनर्जी प्रकल्पाची क्षमता 750 टन एवढी आहे. येत्या 1 एप्रिलपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून महापालिका दररोज 300 टन कचरा या प्रकल्पाला देत आहे. मात्र, दररोज सरासरी 200 टन इतकाच कचरा महापालिका येथे देत असल्याने करारातील अटींचे पालन न झाल्याने या कंपनीने महापालिकेकडे 14 लाख रुपये इतका परतावा मागितला आहे.
रामटेकडी येथील कचरा प्रकल्पांमध्ये कोरोनाकाळात 1 लाख 39 हजार मेट्रिक टन कचरा साचला होता. महापालिकेने येथील कचरा उचलण्यासाठी टेंडर काढले. महापालिकेने कचरा उचलणार्या कंपन्यांना 980 रुपये मेट्रिक टनाप्रमाणे पैसेही दिले, मात्र यातील 10 हजार टन कचरा शिल्लक कसा शिल्लक राहिला, याची आयुक्तांनी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पूना बायो एनर्जी या प्रकल्पात शिल्लक असलेल्या 12 हजार टन कचर्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पात आवश्यक तेवढ्या कचर्यावर प्रक्रिया होत नसल्याने प्रकल्पाला 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
– राजेंद्र तिडके, कनिष्ठ अभियंता, घनकचरा विभाग, महापालिका
हेही वाचा