आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल होत आहेत. शहरातील धर्मशाळा, राहुट्यांमधून अभंगाचे सूर निघू लागले असून वातावरण भक्तिमय होऊ लागले आहे. माउली दर्शनासाठी भाविक दर्शनबारीत दाखल होत आहेत. दर्शनबारी इंद्रायणी नदीपलीकडे गेली असून भक्तीसोपान पुलावरील व नदीपलीकडील कमानीमध्ये असलेली दर्शनबारी पूर्णपणे भरलेली दिसून येत आहे. इंद्रायणी नदीपात्रात भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. शहरात वारकरी भाविकांसाठी विविध साहित्य, वस्तू असणार्या दुकानांमध्ये देखील गर्दी होऊ लागली आहे.
कार्तिकीनिमित्त शहरात विविध ठिकाणी वारकरी भाविकांसाठी माउलीभक्त अन्नदान करीत आहेत. राज्यभरातून दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहरात चैतन्य फुलले आहे. पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्याने भाविकांना विनाअडथळा चालता येत आहे. याबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले. पालिकेकडून दहा महत्त्वाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा फायदा भाविकांना होत आहे.
हेही वाचा :