पुणे

पुणे : कल्याण-नगर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; २४ तासात तीन अपघात

backup backup

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : नगर- कल्याण महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून गेल्या २४ तासांच्या आत झालेल्या तीन अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनजन जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. २०) ओतूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कोळमाथा येथे हॉटेल दत्त भेळसमोर पायी चाललेली एक युवती आणि दुचाकीस्वार पती-पत्नी यांना एकाच वेळी धडक दिल्याने पायी जाणारी मुलगी आणि दुचाकीवरील महिला ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) व सविता गीताराम तांबे (४५) या दोन महिला ठार झाल्या असून गीताराम नामदेव तांबे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त तीनही व्यक्तींची घरे घटनास्थळापासून सुमारे २०० मीटरच्या आतच असून ओतूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान-कल्याण नगर महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीप समोर एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले आहे. सचिन सुर्यवंशी (वय ४०, रा. डिंगोरे)असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दोन्ही अपघातांची खबर मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी  घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे हे दोन्ही अपघात बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडले.

दरम्यान २४ तासांचे आत घडलेले तीनही अपघात मन सुन्न करणारे असून कल्याण-नगर महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा? असे प्रश्न उपस्थित करणारा ठरू पहात आहे. विशेष मंगळवारी (दि. १९) झालेला अपघात व बुधवारी झालेला अपघात हा पिकअप टेम्पोनेच केलेला आहे. कोळमाथा येथे झालेला अपघातातील पीकअप धडक दिल्यानंतर पलटी झालेला आहे. अलीकडच्या काळात पिकअप गाड्यांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून बेशिस्तपणे वेगात व कधीकधी सरळ रस्ता असूनही नागमोडी वळणे मुद्दाम घेत चाललेल्या पिकअपमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या पहाणीत आढळून आले आहे, अशा चालकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT