पुणे

बारामतीत पावसाची दडी ; पाण्यासह चार्‍याचा प्रश्न गंभीर

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांपासून बारामती तालुक्याला पावसाने हुलकावणी दिली असून, तालुक्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले आहेत. शेती जगवायची कशी, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. जनावरांना चाराही मिळेनासा झाला आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना वाढत्या महागाईने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. बागायती पट्ट्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. ऐन पावसाळ्यात बारामतीकर उकाड्याने हैराण झाले असून, पुन्हा 'एसी' आणि 'फॅन'ची आवश्यकता भासू लागली आहे. पावसाने दडी मारली असून, बारामती तालुक्यातील जनता वाढलेल्या उन्हाने त्रस्त झाली आहे.

उन्हाची तीव्र ता वाढली असल्याने विद्युत उपकरणे सुरू राहत असल्याने वीजबिलातही वाढ झाली आहे. एकीकडे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. त्यातच महावितरण सुरू केलेले 'फोर्स लोड शेडिंग'मुळे नागरिकांना त्रस्त केले आहे. ऐन पावसाळ्यात शेतातील उभे पिके जळू लागली आहेत. बारामती शहरातील थंड पेय, आईस्क्रीम, सरबत तसेच थंडावा देणार्‍या फळांची मागणी वाढली आहे.

शहरासह ग्रामीण भागात उन्हाचा तीव्र चटका वाढला असून, वाढलेल्या उन्हाने ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात तरी तालुक्यात सरासरी एवढा पाऊस पडावा, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.

सरासरीएवढाही पाऊस नाही
तीन महिन्यांपासून बारामतीत सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने शेती जगवायची कशी, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. विहिरी, ओढे, नाले, तळी, कोरडे पडले असून, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

गणेशोत्सवाकडे डोळे
पंधरा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापर्यंत समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. तब्बल तीन महिने कोरडे गेल्याने शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत तर बहुतांशी शेतकर्‍यांनी ऊस जनावरांना चारा म्हणून घालणे पसंत केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT