विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत; अजित पवार यांचे आव्हान Pudhari
पुणे

Ajit Pawar: विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत; अजित पवार यांचे आव्हान

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

शिवनगर: जवळपास 19 हजार 700 ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न असल्याने मी चेअरमनपदाची उमेदवारी जाहीर केली; मात्र त्यामुळे विरोधकांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी आपापल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत, असे आव्हान दिले.

पवार म्हणाले, माळेगाव साखर कारखान्याची स्थापना 1955 मध्ये झाली. आज जवळपास 70 वर्षांचा काळ लोटला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या कुटुंबाचा, त्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. मला साखर कारखानदारीतला मोठा अनुभव आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या शब्दाला वजन आहे. (Latest Pune News)

बारामती तालुक्याच्या विकासाचा झंजावात आपण पाहिला आहे. माझ्या अधिपत्याखाली असलेला सोमेश्वर साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अडचणीत होता, परंतु आज तोच कारखाना आता राज्यात उच्चांकी ऊस दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने माळेगावचा नावलौकिक राज्यात मोठा आहे.

आपल्या सत्ताधारी संचालकांनी मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊस दर दिला आहे, असे असताना विरोधक चुकीच्या पद्धतीने आरोप करून कारखान्यावर कर्ज असल्याचा अपप्रचार करतात; मात्र जर कर्ज असते तर राज्यातील खासगी आणि सहकारी अशा जवळपास 200 साखर कारखान्यांपेक्षा मागील गाळप हंगामाच्या उसाच्या उचलीपोटी माळेगावने सर्वात जास्त अ‍ॅडव्हान्स दिला आहे, अजून फायनल पेमेंट दिले नाही.

तुम्ही जर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या विचाराचे पॅनेल निवडून दिले, तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा न देता, काटकसरीने कारखाना चालवून दाखविल. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी शब्दाचा पक्का आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माझी ख्याती आहे.

माळेगाव कारखान्याच्या परिसराचा विकास करून चेहरामोहरा बदलणार आहे. त्यासाठी सभासदांच्या पैशाला हात न लावता केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच आमदार फंडातून, डीपीडीसी, सीएसआर आदींच्या माध्यमातून निधी आणण्याची धमक माझ्यामध्ये आहे. मी जवळपास 7 लाख 20 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

फक्त माळेगाव कारखान्याच्या बाबतीत माझा तुमचा संबंध येणार आहे असे समजू नका. मी तुमचा आमदार तसेच पालकमंत्री देखील आहे. त्यामुळे नोकरी, बदली, पोलिस ठाणे, महसूल आदींबाबत मी तुम्हाला मदत करू शकतो, तसेच गावाच्या सामाजिक विकासासाठी माझी तुम्हाला मदत राहील, असे पवार यांनी सांगितले.

आपल्याला निरा नदी स्वच्छ ठेवायची आहे. त्या दृष्टीने झिरो डिस्चार्जबाबत प्रयत्न करणार आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या बदलत्या धोरणानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. माझे केंद्रातील तसेच राज्यातील मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. राज्याचे कृषिमंत्री माझ्या पक्षाचे आहेत. असे असताना तुम्हाला एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जास्तीचे ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

माळेगावच्या कार्यक्षेत्रातील 37 गावांतील लोकांच्या प्रपंचाचा प्रश्न असल्यामुळे आपण विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्याला जास्तीचा ऊस दर तसेच इतर मदत कोण करेल याचा विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वय झाल्यावर थांबायचं असतं

निसर्गाचा नियम आहे, वय झाल्यानंतर शारीरिक तसेच मानसिक क्षमतेत बदल घडतो, थकवा जाणवतो अशावेळी कार्यक्षमता कमी होते, परंतु काही लोक वयाचा विचार न करता केवळ स्वार्थासाठी हट्टाने उभे आहेत, अशी टीका चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने जर मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो तर माझ्या कामाच्या पद्धतीनुसार मी सकाळी सात वाजताच संचालकांची मीटिंग घेईल. त्यामुळे त्यांना देखील लवकर उठून काम करण्याची सवय लागेल. तसेच कोणालाही गाडी, नाश्ता, जेवण इतर अनावश्यक खर्च करू देणार नाही.
- अजित पवार , उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT