दौंड :पुढारी वृत्तसेवा : देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन साखरेचे उत्पादन कमी करून उसापासून इथेनॉल करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन आवाहन नितीन गडकरी यांनी साखर कारखानदार, उद्योजकांना केले. सद्यस्थितीप्रमाणे केवळ साखर उत्पादनाकडेच लक्ष दिले तर आगामी काळात ते उद्योगासाठी संकटकाळ ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पाटेठाण (ता.दौंड) येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या सीबीडी प्रकल्पाचे उद्घाटन व कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की,सध्या आपल्याकडे तांदूळ, मका,आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे, ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे साखर उद्योगाला झळाळी मिळाली.
मात्र असे सातत्याने घडेल असे सांगता येत नाही याची आठवण करून देत गडकरी म्हणाले की,साखरेचे उत्पादन कमी करणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले आहे. ग्रीन हायड्रोजन हे देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करणारे इंधन असून याकडेही लक्ष देण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.
साखर कारखान्यांनी आपल्या कारखान्यांमध्ये आणि इतर भागात इथेनॉल पंप सुरू करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले ते म्हणाले, ज्यामुळे 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि मोटारी बाजारात मोठ्या प्रमाणात येतील. इथेनॉल वापरामुळे प्रदुषण कमी होईल आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होईल.
याप्रंसगी अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे,विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बांगडे, दौंडचे आमदार राहुल कुल,शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार,माजी आमदार रमेश थोरात,जिल्हा बॅकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे,हभप सुमंत हंबीर,सुरेश महाराज साठे,माधव राऊत,प्रदिप जगताप,जगदिश कदम,प्रदीप कंद,नाना जाधव,सुभाष हिरेमठ,आदीसह कारखान्याचे संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावित कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी तर आभार कारखान्याचे मुख्याधिकारी डी.एम. रासकर यांनी मानले
पांडुरंग राऊत यांचे कार्य संघ विचाराने प्रेरित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार हीच जीवनाची पुंजी आहे . दिन दलित लोकांना परमेश्वर मानुन सेवा करायला दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितले डॉ.हेडगेवार,गोळवलकर गुरूजींच्या राष्ट्रनिर्माण व स्वदेशी विचाराने प्रेरित होऊन संघाचा एक स्वयंसेवक म्हणून पांडुरंग राऊत यांनी पाटेठाण व परिसरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत जनउपयोगी काम केले अशा शब्दात नितीन गडकरी यांनी पांडुरंग राऊत यांचे कौतुक केले.