पुणे

बिबट्यांची वाढती संख्या वनविभागासाठी ठरतेय डोकेदुखी

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मुबलक पाणी, अधिवासाला अनुकूल वातावरण, यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्री-अपरात्री तसेच दिवसा कुठेही बिबटे आढळतात. पिंजर्‍यात भक्ष्य ठेवलं तरी हे बिबटे हुलकावणी देत आहेत. त्यामुळे बिबटे पकडणे वनविभागासाठी एक डोकेदुखी ठरत आहे.

बिबट्यांचे वाढते प्रजनन मानवासाठी धोकेदायक झाले आहे. दररोज पाळीव प्राण्यांवर अथवा माणसांवर बिबट्यांनी हल्ला केल्याचे वृत्त कानावर पडते. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. ऊसतोडणी मजूर भल्या पहाटेच तोडणीला जात आहेत. हे मजूर आपल्या लहानग्यांनासुद्धा सोबत घेऊन जातात. त्यांना उसाच्या सरीमध्ये ठेवून मजूर तोडणीची कामे करतात. एखाद्या उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले असतील तर बिबट्याची मादी मजूर अथवा मुलांवर हल्ला करू शकते. यातून जीवितहानी होण्याचा संभव असतो.
जुन्नरमध्ये बिबट्यांची अधिकृत आकडेवारी मात्र अद्याप स्पष्ट होत नाही. तथापि, तालुक्यात सुमारे तीनशेच्यावर बिबटे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या बिबट्यांना पकडणे अथवा त्यांना रोखणे वनविभागाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.

आळे गावात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा बळी

दीड महिन्यांपूर्वी आळे येथील दोन वर्षांच्या बालकाचा बिबट्याने जीव घेतला होता. तरीही अद्याप बिबटे पकडण्यासंदर्भात वन विभागाला जाग आलेली दिसत नाही. बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी नसबंदीची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके करीत आहेत. परंतु, सरकारकडून कोणताही निर्णय होत नाही. बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एखादी व्यक्ती जखमी अथवा ठार होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी वनविभाग तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करते. वन कर्मचारी नेहमीच सतर्क असतात. नागरिकांनीसुद्धा बिबट्या आढळला तर तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.

– प्रदीप चव्हाण, वन क्षेत्रपाल,

जन्नर वनविभागशेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट

हेही वाचा

SCROLL FOR NEXT