वडगाव मावळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींची पहिली बारी मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे 11 व 12 फेब्रुवारीला रंगणार आहे.
आमदार सुनील शेळके यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या शर्यतीस सशर्त परवानगी दिली आहे.
न्यायालयाने बंदी उठल्यानंतर आमदार शेळके यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते, त्यासाठी जय्यत तयारीही केली होती, परंतु शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केल्याने ही शर्यत रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने आमदार शेळके यांनी पुन्हा बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते व खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यत होत असल्याने बैलगाडा शौकीन, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार शेळके यांच्या पुढाकाराने होणार्या या शर्यतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शर्यतीचे नियोजन अखिल भारतीय बैलगाडा संघटना व मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.
दरम्यान या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकात येणार्या प्रत्येक बारीस एक दुचाकी देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांकास 1 लाख 51 हजार, तृतीय क्रमांकास 1 लाख व चतुर्थ क्रमांकास 75 हजार रुपयांची रोख बक्षिसे व प्रत्येक क्रमांकास अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
फायनलमध्ये येणार्या बैलगाड्यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार व 21 हजार रुपयांची रोख बक्षिसे व घाटाचा राजा किताब पटकवणार्या गाड्यास एक तोळ्याची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
https://youtu.be/gfZJcopVz0g