पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर गृह विभागाने धडक कारवाई करत ७० अनधिकृत पबवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यासह राज्यातील पब आणि बारमध्ये नियमांचे पालन होत आहे का, हे तपासण्यासाठी 'एआय' कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, भास्कर जाधव, रोहित पवार, रवींद्र धंगेकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर फडणवीस
यांनी याबाबत आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी सक्रिय भूमिका बजावली असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाईची गरज नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई केली आहे.
तरुणाईला ड्रग्जच्या जाळ्यात ओढले जात आहे. पूर्वी बाहेरून ड्रग्ज आणावे लागत होते; आता ते केमिकलपासून बनवले जातात. सरकारने त्यावरही कारवाई केली असून ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू आहे, पोलिसांचा त्यात सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या घटनेनंतर सत्ताधारी नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी तो फेटाळून लावला. या प्रकरणी कोणत्याही मंत्र्यांचा पोलिसांना फोन आलेला नाही. स्थानिक आमदार पोलिस ठाण्यात गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलेले आहे. त्याची नोंद घेण्यात आली आहे, मात्र याप्रकरणी कोणीही दबाव मआणलेला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.