पेठ (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. आंबेगाव) येथील वनविभाग कार्यालयाजवळ मंचर बाजूने पुण्याला जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर अचानक बसविलेला गतिरोधक अखेर मंगळवारी (दि. 13) काढण्यात आला. याबाबत दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध करताच गतिरोधक काढून घेण्यात आल्याने वाहनचालक व प्रवाशी यांनी समाधान व्यक्त केले. तीन दिवसात या ठिकाणी वाहने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एकमेकांवर आदळत होती, यामुळे वादविवाद तसेच भांडणे होत होती.
हा गतिरोधक कोणाच्या सांगण्यावरून तयार केला, अशी तक्रार प्रवाशांनी केली होती. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर घाट चढून वर आल्यावर पुण्याकडे फॉरेस्ट हद्दीत या गतिरोधकावर वाहनांची टक्कर होत असे. येथे कोणताही सूचनाफलकदेखील लावलेला नव्हता. तसेच रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने किंवा पांढरा पट्टा मारलेला नसल्याने दिवसा व रात्री दुचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट
शक्यता होती.
हा गतिरोधक कसा जीवघेणा ठरतो हे दै. 'पुढारी'मध्ये प्रकाशित झाले होते. त्यांनतर हा गतिरोधक काढण्यासाठी आंबेगाव तालुका शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष दिलीपराव पवळे, सदाभाऊ गुंजाळ, कैलास धुमाळ, भावेश रागमहाले, दत्तू पवळे यांनी घटनास्थळी पोहोचून तो काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार रस्त्यावरील या गतिरोधकाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात येऊन तो जेसीबी लावून काढून टाकण्यात आला, यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा :