फुरसुंगी: राज्यात जनगणना प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे शिक्षकांची चांगलीच दमछाक होत आहे. शाळेची माहिती देणे, उन्हाळी वर्ग, शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया आणि बीएलओ संबंधित जबाबदाऱ्यांसोबतच आता जनगणनेचे कामही शिक्षकांना करावे लागत आहे.
या कामासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हातान्हात फिरून शिक्षक नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक घरी उपलब्ध नसणे, काहींकडून माहिती देण्यास टाळाटाळ होणे, उन्हाची काहिली व भटक्या कुत्र्यांच्या त्रास, अशा अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एका घरासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत असून, जनगणनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ग््राामीण भागासह शहरातील काही भागांत नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वाढते तापमान, लांबचा प्रवास आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षक त्रस्त झाले असून, जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील कर्तव्य असले तरी त्यासाठी आवश्यक सुविधा आणि नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास जनगणना प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि सुरळीतपणे पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जनगणना हे महत्त्वाचे काम आहे. आम्ही जबाबदारीने ते पार पाडत आहोत. मात्र, अनेक वेळा एका घरासाठी दोन ते तीन फेऱ्या माराव्या लागतात. तरीदेखील माहिती मिळत नसल्याने वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. नागरिकांनी या राष्ट्रीय कर्तव्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.एक शिक्षक