बारामती: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर खा. सुप्रिया सुळे यांनी आमच्या पक्षासंबंधी चर्चा सुरु असतात पण सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत, गेली १२ वर्षे आम्ही विरोधी पक्षातच असून मायबाप जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निष्ठेने काम करत असल्याचे सांगितले.
बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. १६ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येत आहेत. त्यामुळे या चर्चा पुन्हा सुरु झाल्या असून याबाबत सुळे म्हणाल्या, आमची चर्चा बारा वर्षे चालली आहे. सगळे चॅनेल तेच दाखवतात. आणखी तीन वर्षे ही चर्चा चालू द्या, तुम्हालाही चॅनेल चालवायचे आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे आज आम्ही विरोधी पक्षात आहोत.
आधी रस्ते नीट करा मग शक्तीपीठाचा घाट घाला
शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे, त्यांना सोबत घेवून चर्चा केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारने सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शक्तीपीठ करत असताना राज्यातील अन्य रस्त्यांची काय परिस्थिती आहे, ही मी सांगायला नको. राज्यातील मुले तंत्रज्ञानाचा उपयोग करून रस्त्याचे व्हिडीअो काढत पाठवत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आंदोलने सुरु आहेत. राज्यात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे कळेना अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने आधी रस्ते नीट करावेत आणि मग मोठ्या प्रकल्पाचा घाट घालावा असे त्या म्हणाल्या.
राज्यात ठेकेदार कामाची रक्कम मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत. एकीकडे शक्तीपीठाला हजारो, करोडोंचा खर्च करता मग ज्यांनी कामे केली त्यांना निधी का देत नाही, सरकारकडे निधीच नाही. राज्याचे आर्थिक धोरण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्या म्हणाल्या.
ही तर दडपशाही
सीजेपीच्या अभिजित दीपके यांनी काही शाळांमध्ये जात व्हीडीअो काढत ते प्रसारित केले. त्यानंतर राज्य सरकारने शाळांमध्ये जात शुटींग करण्यास मज्जाव केला आहे. ही दडपशाही असून त्याचा मी निषेध करते, असे सुळे म्हणाल्या. मनमोकळेपणाने बोलण्याचा, श्वास घेण्याचा अधिकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला आहे. मग हा चोरी लपवण्याचा दुदैवी प्रयत्न कशाला असा सवाल त्यांनी केला. प्रत्येकाने व्हिडीअो काढावेत, तक्रार द्यावी. नवीन पिढीने शिक्षणाबद्दलचे वास्तव समोर आणणे हा जर गुन्हा असेल तर तो मी स्वतः करेन, मला सरकारने जेलमध्ये टाकावे असे त्या म्हणाल्या.
एसआयआरबाबत पुढील दोन महिने प्रयत्न
एसआयआर ज्यांनी नावे राहिलेली आहेत त्यांना दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे मुदतीत नावे घालू शकता, चुक झाली असेल तर दुरुस्त करू शकता. पक्षातर्फे आमचे कार्यकर्ते पुढील दोन महिने यासाठी काम करतील असे त्या म्हणाल्या.