Sunetra Pawar Pudhari
पुणे

Sunetra Pawar Deputy Chief Minister: सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्री; अजितदादांच्या स्वप्नांची जबाबदारी स्वीकारली

बारामतीची ‘वाघीण’ पुढे आली; दुःखावर मात करत नेतृत्वाची धुरा समर्थपणे हाताळणार

पुढारी वृत्तसेवा

सुहास जगताप

पुणे: दिवंगत अजितदादांना त्यांच्या राजकीय, सामाजिक कामात भक्कम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांनी शनिवारी (दि. 31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत अजितदादांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बारामतीची ही वाघीण अश्रू आवरून जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी, अजितदादांवर प्रेम करणाऱ्यांना सावरण्यासाठी उभी राहिली आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बारामतीतील महिलांनी व्यक्त केली आहे.

आपल्या माहेरच्या घरापासूनच सुनेत्रा वहिनींना राजकारण, समाजकारणाचा वसा मिळाला आहे, त्यामुळे त्या नवख्या आहेत, अशा समजात कोणी राहू नये. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वडील दिवंगत बाजीराव पाटील यांच्या रूपाने त्यांनी देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि मराठवाडामुक्ती संग््रााम अनुभवला आहे, तर बंधू डॉ. पद्मसिंह पाटील यांचे राज्य आणि देशपातळीवरील राजकारण पाहिले आहे. तर, अजितदादांशी विवाह झाल्यानंतर पवार घराण्याच्या राजकारण, समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे, त्यामुळे हे क्षेत्र त्यांना नवखे नाही. अजितदादांना तर त्यांनी गेली चाळीस वर्षे साथ दिली आहे. या अनुभवावर त्या राज्याचे राजकारण आणि समाजकारण समर्थपणे सांभाळतील, असे निश्चितपणे वाटते.

सुनेत्रा वहिनी उच्चशिक्षित आहेत. राज्यसभेच्या सदस्या आहेत, याबरोबरच त्यांनी बारामतीच्या समाजकार्यात मोठा सहभाग नोंदवला आहे. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या त्या अध्यक्षा आहेत, या माध्यमातून त्यांनी बारामतीमध्ये हजारो महिलांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. विद्या प्रतिष्ठान आणि कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठे शैक्षणिक काम केले आहे. एन्व्हॉयर्मेंट फोरम ऑफ इंडिया, बारामती या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या संस्थेचे पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठे काम आहे आणि त्यामध्ये नियोजन, अंमलबजावणीत सुनेत्रा वहिनी यांचा मोठा वाटा आहे, अशा मोठ्या पार्श्वभूमीमुळे एक बाब निश्चित आहे की, सुनेत्रा वहिनींना प्रशासकीय आणि अंमलबजावणीचा मोठा अनुभव असल्याने अजितदादांच्या निधनाने अचानक अंगावर पडलेली राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची आणि पक्षाची जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळू शकतात, असा विश्वास वाटतो.

अजितदादांच्या अचानक जाण्याने पक्षाचे नेते, कार्यकर्ते, अजितदादांचे चाहते यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, संपूर्ण राज्यात दु:खाचा कल्लोळ उडाला, त्यांच्यात आपण पोरके झाल्याची एक असुरक्षिततेची भावना तयार झाली होती, अशा वेळेला अजितदादांची जबाबदारी तातडीने सांभाळण्याची अतिशय गरज होती आणि त्यामुळेच आपले सर्व दुःख दूर करून सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी तातडीने स्वीकारून पक्षाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला, गावागावांतील पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

आपला पक्ष समर्थ नेतृत्वाच्या हातात आहे, याची जाणीव या सर्वांना झाल्याने त्यांचा आक्रोश कमी होण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळेच सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी सांभाळल्यानंतर बारामतीतील एका महिला पदाधिकाऱ्याने ‌‘आमची वहिनी बारामतीची वाघीण आहे, ती घरात रडत बसली नाही, तर पुढे येऊन तिने आपली जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे, हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे,‌’ असे उत्स्फूर्त उद्गार काढले. यातूनच सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेची आणि लोकप्रियतेची चुणूक दिसून येते. सध्या राजकीय स्थिती पाहता वहिनींनी पुढे येऊन जबाबदारी घेण्याची गरज होतीच, ती त्यांनी पूर्ण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT