पुढारी ऑनलाईन डेस्क : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महत्वाचे वक्तव्य करत सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त होताच हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येईल.
प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, " दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्य जनतेचा विश्वास वैद्यकीय यंत्रणेवर डळमळीत होतो. म्हणूनच या प्रकरणात कसून चौकशी होणार आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
ते पुढे म्हणाले की, "सध्या अनेक चॅरिटी हॉस्पिटल्सकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा हॉस्पिटल्सवर देखील सरकार जातीने लक्ष ठेवणार आहे आणि आवश्यकता भासल्यास तिथेही कारवाई केली जाईल." राज्यमंत्री जाधव यांनी स्पष्ट केलं की चॅरिटी हॉस्पिटल्सना जनतेच्या हितासाठी विशिष्ट सवलती देण्यात आलेल्या आहेत. मात्र, काही हॉस्पिटल्स या सवलतींचा गैरवापर करत आहेत. यापुढे नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांवर बंधन आणले जाईल.
या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. चॅरिटी हॉस्पिटल्सच्या पारदर्शक कामकाजावर जोर देण्यात येणार असून, गरजू रुग्णांना योग्य वागणूक मिळावी यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणार आहेत.