राहुल हातोले
पिंपरी(पुणे) : महिलांचा आर्थिक गुंतवणुकीत सहभाग वाढावा, यासाठी टपाल विभागाच्या वतीने सुरू केलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत खाते उघडण्यात तमिळनाडू राज्य अग्रेसर ठरले आहे. त्याबाबत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे.
या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी देशातील सर्व राज्यांतील टपाल कार्यालयाला बचत प्रमाणपत्र उघडण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार, तमिळनाडू राज्याने 1 लाख 56 हजार 516 खाती उघडली आहेत. तर महाराष्ट्र सरकारने 99 हजार 507 खाती उघडली आहेत.
यासोबतच एका दिवसात सर्वांधिक खाती उघडणार्या राज्यांची नावेदेखील टपाल विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जात आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश सरकारने सर्वाधिक खाती उघडून या योजनेत बाजी मारली आहे. तर महाराष्ट्र यामध्येही पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्यांची खाती काढण्याची जबाबदारी थेट अधिकारी आणि कर्मचार्यांवर सोपविली आहे. यामध्ये दलालांना कोणताच फायदा नसल्याने योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
या योजनेत किमान 1 हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत रकमेची गुंतवणूक करत येऊ शकते. वर्षभराच्या कालावधीनंतर खात्यातील रक्कम गरजेच्या वेळी काढता येऊ शकते. एका वेळी खातेदारास 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकेल.
नवजात मुलीपासून सर्व वयातील महिलांसाठी टपाल विभागाची सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षे कालावधीसाठी ही योजना असेल. या योजनेतील गुंतवणुकीवर संबंधित खातेदारास व्याज तसेच 7.5टक्के चक्रवाढ व्याज रक्कम देणारी ही योजना आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात खाती उघडली जावी, यासाठी टपाल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच कर्मचार्यांना उद्दिष्ट दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण असूनही या योजनेसाठी सर्व प्रयत्नशील आहेत.
– नितीन बने, जनसंपर्क डाक निरीक्षक, पिंपरी मुख्य कार्यालय.
हेही वाचा