जळोची: एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचार्यांना नक्त वेतन देण्यात येत असून या जून महिन्यात पुन्हा पूर्ण वेतन देण्याइतका निधी सरकारकडून आलेला नाही.
कर्मचार्यांच्या हिताच्या गप्पा मारणार्या सरकारचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याने एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे.(Latest Pune News)
ती कधीच पूर्ण येत नसल्याने पूर्ण वेतन देण्यात अडचणी वेतन निर्माण होत असून पी.एफ., ग्राजुटी, बँक कर्ज, एल.आय. सी. अशी ही साधारण 3500 कोटी रुपयांची देणी कर्मचार्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या-त्या संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली नाहीत.
कर्मचार्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम ही 7 हजार कोटी रुपयांवर गेली असून संचित तोटा 10 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन हतबल झाले आहे. या महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी दर यासाठी शासनाकडे एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची मागणी करण्यात आली होती; मात्र त्यातील केवळ 374 कोटी 9 लाख रुपये इतका निधी सरकारकडून देण्यात आला आहे.
87 हजार कर्मचार्यांना नक्त वेतन देण्यासाठी 377 कोटी रुपये इतकी रक्कम लागते तर पूर्ण वेतन देण्यासाठी 460 कोटी रुपये इतकी रक्कम लागते. पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या महिन्यातही नक्त वेतन देण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढवली असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
परिवहनमंत्र्यांची शिष्टाई निष्फळ
एप्रिल महिन्यात पूर्ण वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्यातील अधिकार्यांना मागणी करण्यात आलेली पूर्ण रक्कम एसटीला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, अर्थ खात्यातील अधिकार्यांनी त्यांनाही जुमानले नसून त्याची शिष्टाई देखील निष्फळ ठरली असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.
रजा रोखीकरण रोखले
आर्थिक अडचणीच्या वेळी कर्मचारी आपल्या शिल्लक रजेतील काही रजा विकत असतात. त्याचे त्यांना पैसे मिळत असतात. पण या वेळी निधी अभावी रजा रोखीकरण महामंडळाकडून रोखले असून अंदाजे तीन कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचार्यांना या महिन्यात मिळणार नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.