पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज शुक्रवारपासून (दि.20) उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध केंद्रांवर पहिल्या पेपरसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळांकडून अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी अनेक शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि त्यांचे औक्षण करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. "विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने पेपर लिहावा," असा संदेश यावेळी शिक्षकांनी दिला.
पहिला पेपर भाषेचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र वातावरण होते, मात्र शाळेने केलेल्या या स्वागतामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील भीती कमी होऊन एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व नियम पाळून परीक्षेची पहिली घंटा वाजली...