तळेगाव दाभाडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप भातपिकाच्या पेरण्या रखडणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीप भात रोपांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. मावळ तालुका हा खरीप भातपिकाचे आगार असून तालुक्यात सुमारे तेरा हजार हेक्टर जमिनीवर भातपीक घेतले जाते. या पिकाच्या रोपांच्या पेरण्या मान्सूनच्या आगमन होताच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू केल्या जातात.
यावर्षी मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असल्याने भात रोपांची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही पाऊस असाच उशिरा सुरू झाला होता; मात्र पुढे पाऊस मुबलक पडल्याने भातपीक चांगले झाले होते. मान्सूनचा पाऊस वेळेवर येईल, या आशेने शेतकरी बांधवांनी खरीप भातपीक पेरणीपूर्व कामे करून ठेवली आहेत. तसेच बियाणे, खते यांची सर्व जमवाजमवही करून ठेवलेली आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरीबांधव आभाळाकडे डोळे लावून वरुणराजाची प्रतीक्षा करत बसला आहे.
हेही वाचा